Sunday, November 27, 2016

भजी आणि डार्विनची गोष्ट .....


फेसबुक वर एक अंगत-पंगत नावाचा ग्रुप आहे , आणि त्यातल्या एका पुण्याच्या मैत्रिणीने , शिवांगी दातारने , एके   दिवशी विविध  प्रकारच्या भजी  करायचं ठरवलं . डाळीचं पीठ भिजवलं , आणि प्राथमिक तयारी केली . बटाट्याच्या पातळ चकत्या , तिखट-मीठ-मिरच्या-कोथिंबिरीच्या घोळक्यात , अश्रूपात करणारे कांदे , हादग्याची  फुलं , विड्याची पानं ,ओव्याची पानं , आणि शेवटी, एक दोन झणझणीत मिरच्या !  

मग सर्वांनचा फोटो काढला . सर्व पदार्थाना कदाचित कळाले नसेल, कि आपला हा आयुष्यातला शेवटचा फोटो असेल

दिसायला सर्व फार छान , पण थोड्याच वेळात ह्या सर्वांचं काय होणार आहे , हे त्यांना तरी माहित असेल का , असा प्रश्न माझ्या मनात आला . हे सर्व , बीजापासून मोठे होणारे , जो वर झाडाशी निगडित आहेत ,  तो वर जिवंत असलेले प्रकार आहेत . त्यांच्या पण जगात जन्म होतात, आयुष्य असतात आणि मृत्यू होतो.


मग सुचली त्यावर एक कविता .   त्यांच्या बाजूनी जग कसे आहे , याचा एक अंदाज घेऊन .




(खालील फोटो स्वतः शिवांगी दातार ह्यांनी काढलेला आहे . त्यांच्या परवानगीने तो येथे वापरात आहे. )



कोणी अंधारातून प्रकाशाकडे झेप घेऊन ,
तडक एका टोपलीत ,
आणि मग आयुष्यातील ह्या क्षणाबद्दल कुजबुज,
आणि कुणा एका ओट्यावर विश्रांती .
पलीकडे एका वेलावर डुलणारी विड्याची पाने
अचानक ताटात ओव्याच्या पानांना बघून
आचंबित ;
ज्येष्ठ नागरिक आणि बच्चा कंपनी एकत्र ठेवले
ह्याचा अर्थ आज काहीतरी अघटित घडणार .
मग तेवढ्यात एका तसराळ्यात मलूल पडलेली हादग्याची फुले.

डार्विन च्या सिद्धांताचे चालते बोलते उदहारण .
मानवाचे स्वतःपेक्षा कमी शक्तिमान व्यक्तींवरचे वर्चस्व ...

आणि मग येते तेलपरीक्षा .

बटाटे अगदी चकत्या होऊन पडतात ,
आणि कांदे अगदी तुकडे होऊन
चक्क तिखट मिठात बसून रडतात ;
मग उगी उगी म्हणत बेसनाचे आगमन ,
आणि कांद्याला जवळ घेऊन बसणं .
आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलाय
ह्याचा विचार करत बाकीचे गुंग.

बेसनाचा गुठळ्या मुक्त , तिखटमीठ घातलेल्या ,
पाण्यात वावर,
आणि जणू काही
मोठ्याने , आयुष्याच्या शेवटी कसे वागावे ,
ह्याचे उदाहरण द्यावे ,
अशा पद्धतीने ,
बटाट्याचा कापानने दाखवलेले कृती ;
गरम तेलात , बेसनाच्या आवरणात बुडणे,
आणि रंग बदलून, शिजून,
झाऱ्याची मदत घेऊन बाहेर
आपला श्वास पकडत स्वस्थ बसणे .
कांदे लोकांची शेवटची धडपड ,
आणि बेसनाचे आवरण असून विवध
आकारात बाहेर येणे.
मोठमोठ्या लोकांचे असे होतंय
तर आपलं काय ,
असा एकीकडे डोक्यात विचार नि दुसरी कडे
बेसनात बुडवून तेलात पदार्पण ,
अशी पानाफुलांची परिस्थिती ;
रागावून, थोडेसे का होईना , पण फुलून जाणे
एवढेच जमलं .

एकीकडे एक शेलाटी हिरवी मिरची
हे सर्व बघत होती,
आणि कुणा एकीने तिलाही बेसनात बुडवून
तेलात सोडले .

काय आहे,
तरुण मंडळींची डोकी जरा लवकरच गरम होतात .

वाट बघून सर्व असह्य झाल्यावर एका एकी
ती मिरची मोठा आवाज करत फुटली,
जणू सर्वांच्या वतीने तिने नोंदवलेला निषेध .

आणि मग झाऱ्याला धरून बाहेर येताना तिने ऐकलेले
एका आईचे शब्द .
"अग जरा जपून , डोळ्यात उडेल हो !" ....

अनादी काळा पासून, भाजी-पाना-फुलांचे
आज पर्यंत चालत आलेले
केवळ त्यागाने भरलेले आयुष्य.

कोणी कधी मिरचीच्या सन्मानार्थ
पुतळा उभारलेला ऐकलंय ?
हादग्याच्या फुलांच्या सन्मानार्थ बनवलेली
बाग बघितलीये ?
बटाट्याच्या नावाचा जलतरण तलाव बघितलाय?

नाही ?
कारण हे सर्व निष्काम कर्म करतात
आणि काहीही फळाची अपेक्षा न ठेवता
आयुष्याच्या शेवटी आपली आहुती देतात .

एकेकाचे प्रारब्ध, एकेकाचे आयुष्य .
बरेच काही शिकवून जातं

2 comments:

  1. looks spicy :)

    by the way, i love the background music.

    ReplyDelete
  2. Blogging is the new poetry. I find it wonderful and amazing in many ways.

    ReplyDelete